पुणे : स्वराज्य न्यूज | शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आज 95 वी जयंती. हिंदूंच्या, देशवासियांच्या आणि अनेक राजकीय व्यक्तींच्या मनात आदराचे स्थान असणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस सर्व स्तरांतून अभिवादन करण्यात येत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनात अनेक अविस्मरणीय प्रसंग आले असतील, परंतु त्यापैकी एका थरारक प्रसंगाचे साक्षीदार नागपूर शहर राहिलेले आहे.
बाळासाहेबांच्या लढाऊ वृत्तीमुळेच ‘त्या’ दिवशी त्यांचा जीव बचावला, असे नक्कीच म्हणता येईल.
घटना 1969 सालची आहे. त्या वेळेस नागपूर विद्यापीठात राजकारणात कम्युनिस्टांची दादागिरी चालत होती. त्यामुळेच चार वर्षे त्यांनी तिथे संघाचा विद्यार्थी संघाचा कुठलाच कार्यक्रम होऊ दिला नव्हता. विद्यार्थी संघाकडे 50 हजार रुपये जमा होऊनही त्याचा काही उपयोग होत नव्हता. त्यामुळे रा.स्व. संघाच्या आशीर्वादाने विद्यार्थी संघातर्फे महालातील टाऊन हॉलवर सात दिवसांचे ‘शैक्षणिक संमेलन’ आयोजित करण्यात आले. त्यासाठी तत्कालीन अनेक नामांकित व्यक्तींना निमंत्रण दिले होते. शिवसेनेच्या स्थापनेला त्यावेळी अवघी तीनच वर्षे झाली होती. या लढाऊ संघटनेचे प्रमुख आणि ‘मार्मिक’चे संपादक बाळ ठाकरे यांनाही कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यात आले होते.
कार्यक्रम जाहीर होताच कम्युनिस्टांच्या वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटली. बाळ ठाकरे यांनी नागपुरात जाऊ नये आणि गेल्यास ते जिवंत परत जाणार नाहीत, असा प्रचार महिनाभर सुरू होता. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनीही परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
बाळासाहेब ठाकरे 12 अंगरक्षक सोबत घेऊन रेल्वेगाडीने नागपूरला येणार, असे ठरले होते. बाळ ठाकरेंच्या येण्याचे संभाव्य पडसाद लक्षात घेऊन विद्यार्थी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी एक योजना आखली. गाडी सकाळी नागपूरला येणार होती, परंतु काहीजण कारने आधीच वर्ध्याला गेले आणि रात्रीच तेथे बाळासाहेबांना उतरवून घेतले. हा काफिला कारनेच नागपूरला आला. हे सर्वजण तेव्हाच्या आमदार निवासात, म्हणजे आताच्या ‘सुयोग’ इमारतीत उतरला.
दुसऱ्या दिवशी बाळासाहेब ठाकरे महालातील संघ कार्यालयात गेले. तेथे त्यांची त्यावेळचे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी आणि बाळासाहेब देवरस यांच्याशी भेट झाली. तो दिवस होता 3 जानेवारी 1969. त्याच सायंकाळी टाऊन हॉलमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे जाहीर भाषण झाले. बाहेर मैदानावर आणि चौकापर्यंत ध्वनिक्षेपकावरून भाषण ऐकण्यासाठी लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. भाषणानंतर गर्दीतील संघ स्वयंसेवक आणि कम्युनिस्ट कार्यकर्ते यांच्यात यथेच्छ मारामारी झाली. संघाचे कार्यकर्ते तयारीनिशी हजर असल्यामुळे कम्युनिस्टांना बराच मार खावा लागला.
सभेनंतर बाळासाहेब आमदार निवासात परतले. त्यांचा दुसऱ्या दिवशी मुंबईला परतण्याचा कार्यक्रम होता, जेवणे झाल्यानंतर ठाकरे यांनी दिलीप देवधर यांना सांगितले, की मला रात्रीच्या विमानाने परत जायचे आहे. त्यांनी ही गोष्ट सोबतच्या सर्व अंगरक्षकांनाही सांगितली नाही. त्यावेळेस नागपूरला रात्रीची ‘एअर मेल सव्र्हिस’ होती. देशाच्या चार महानगरांमधून टपाल घेऊन विमाने नागपुरात येत आणि टपालाची देवाणघेवाण करून परत जात. त्यापैकी मुंबईच्या विमानाने जायचे ठाकरे यांनी निश्चित केले.
बाळ ठाकरे, त्यांचे दोन अंगरक्षक आणि देवधर असे चारजण मोटारीतून विमानतळाकडे निघाले. ठाकरेंच्या हालचालींची खबरबात ठेवून असलेल्या पोलिसांचा प्रचंड ताफा त्यांच्या मागेपुढे होता. वर्धा मार्गावरील ‘अमरप्रेम’ हॉटेल हा कम्युनिस्ट कार्यकर्त्यांचा अड्डा होता. पोलिसांचा ताफा पाहून त्यांना बाळासाहेब ठाकरेंच्या प्रस्थानाची कल्पना आली.
“विमानतळावर पोहचल्यानंतर सफारी सूट घातलेले बाळ ठाकरे आणि देवधर बुक स्टॉलसमोर बोलत उभे होते. त्यांचे अंगरक्षक सुमारे 10 फुटांवर उभे होते, तर पोलीस विमानतळ इमारतीच्या दारात आणि बाहेर होते.
तर यावेळी दहा-बारा लोकांनी बाळासाहेब आणि देवधर या दोघांना घेरले. त्यापैकी एकजण ठाकरेंना ‘आपसे बात करना है’, असे म्हणाला. त्यावर ठाकरे यांनी देवधरला ‘हे लोक कोण?’ असे विचारले. प्रसंगाचे गांभीर्य तत्काळ लक्षात येऊन देवधर सतर्क होत म्हणाले. ‘तुमच्यावर खास प्रेम करणारी ही मित्रमंडळी आहेत’,. बाळासाहेबांना त्यातील इशारा कळला. ‘माझी अपॉइंटमेंट घ्या, आपण जरूर बोलू. आता मला वेळ नाही’, असे ठाकरे यांनी त्या व्यक्तीला सांगितले. त्यावर, ‘आपको बात तो करनी ही पडेगी’, असे तो बाळासाहेबांना म्हणाला.”
“त्या इसमाचे वाक्य पूर्ण होण्याआधीच ठाकरे यांनी सफारीच्या खिशात ठेवलेले रिव्हॉल्वर बाहेर काढले. समोरच्याला काही कळण्याच्या आत त्यांनी त्या मजबूत आणि वजनदार रिव्हॉल्वरच्या दस्त्याचा जोरदार प्रहार करून त्याचे कान आणि थोबाड फोडून टाकले. त्याचे तोंड फुटून रक्ताची चिरकांडी उडाली. त्याबरोबर ‘ठाकरेने मुझे मारा’, असे तो ओरडला. ते ऐकताच बाळासाहेबांचे अंगरक्षक तत्काळ धावले. दोघांनीही पँटच्या शिवणीतून दोन-दोन गुप्त्या बाहेर काढल्या आणि ते 10-12 लोकांच्या घोळक्यावर तुटून पडले. एका साथीदाराचे सांडलेले रक्त आणि हा हल्ला यामुळे भांबावलेले हे लोक जिवाच्या आकांताने पळाले. दोन्ही अंगरक्षक त्यांच्या मागे धावले. अगदी एका मिनिटाच्या आत ही घटना घडली आणि प्रवाशांमध्ये घबराट पसरून दोन मिनिटात संपूर्ण हॉल रिकामा झाला.”
“ही नाटय़मय आणि थरारक घडामोड घडल्यानंतर पोलीस धावत आत आले. तेव्हा बाळासाहेबांमधला व्यंगचित्रकार जागा झाला. ‘तुम्ही फिल्मी पोलीस दिसता. सिनेमा संपल्यावर तुमची एंट्री झाली’, असे ते मिष्किलपणे बोलले.
राजकारणात आपल्या धारदार भाषणाने विरोधकांना घायाळ करणाऱ्या बाळासाहेबांचा हा जिगरबाज लढाऊ बाणा त्यांच्या यशाचे गुपित होता. केवळ शब्दांत नाही तर त्यांच्या प्रत्येक कृतीत, विचारात कमालीचा कणखरपणा होता. आणि म्हणूनच हिंदुस्थानचे राजकारण बाळासाहेबांच्या नावाशिवाय पूर्ण होणे शक्य नाही. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!
प्रसंग संदर्भ : द इंडियन एक्सप्रेस ग्रुप (मुलाखत)