न खाई भोगी तो सदा रोगी….. जाणून घ्या भोगीतील आहाराचे महत्व…..

भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करतात.भोगी आणि मकरसंक्रांत हे कृषीशी संबंधित सण आहेत. भोगी शब्द भुंज या धातूपासून बनला आहे. याचा अर्थ खाणे किंवा उपभोगणे.भोगी हा उपभोगाचा सण होय असे मानले जाते. या दिवशी स्त्रिया अभ्यंगस्नान करतात. तमिळनाडूमध्ये संक्रांतीच्या आधी तीन दिवस पोंगल नावाचा उत्सव साजरा करतात.त्यातल्या पहिल्या दिवसाला ‘भोगी पोंगल’ असे म्हणतात. या दिवशी उपभोगाचे आणि आनंदाचे प्रतीक असलेल्या देवराज इंद्राची पूजा केली जाते.
या दिवशी देवाची पूजा करून भोगीची भाजी, ज्वारीची अथवा बाजरीची तीळ लावून भाकरी बनवण्याची प्रथा आहे. शेतीत नवीन आलेल्या पिकांचा आनंद साजरा करत यादिवशी घरोघरी खास बेत केला जातो. प्रथम या पदार्थाचा देवाला नैवेद्य दाखवून सर्वजण एकत्र जेवायला बसतात.
न खाई भोगी तो सदा रोगी’ हे आपण नक्कीच ऐकलं असेल याचा अर्थच आहे की आनंद घेणारा वा उपभोगणारा ! भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करतात. भोगी हा उपभोगाचा सण आहे. या दिवशी सकाळी घर आणि सभोवतीचा परिसर स्वच्छ करावा. दारासमोर रांगोळी काढावी. घरातील सर्व लोकांनी अभ्यंग स्नान करून नवीन कपडे परिधान करावे. या दिवशी अंघोळीच्या पाण्यात तीळ टाकण्याची पद्धत आहे. भोगीच्या दिवशी महाराष्ट्रात खास भोगीची मिक्स भाजी आणि बाजरीची भाकरी करण्याची पद्धत आहे. या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी आणि खमंग खिचडी करण्याची परंपरा आहे. अनेक ठिकाणी सासरच्या मुली भोगी सणाचा आनंद घेण्यासाठी या दिवशी माहेरी येतात.
इंद्र देवाने धरतीवर उदंड पिकं पिकावी म्हणून प्रार्थना केली होती म्हणून पिकं वर्षानुवर्ष अशीच पिकत राहावी या प्रार्थनेसह भोगी साजरी करण्याची प्रथा आहे. या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुतीही दिली जाते. या दिवशी करण्यात येणारी भोगीची भाजी खूपच पौष्टिक असते.
हिवाळ्याच्या सर्व प्रकारच्या भाज्या येतात. शेताला नवीन बहार आलेला असतो. त्यामुळे या काळात भोगीची भाजी आणि तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतला जातो. या पदार्थांमधून उष्णता येते ज्यामुळे शरीर पुन्हा वर्षभर काम करण्यास सज्ज होतं.
या वर्षी भोगीचा सण अमावस्येला आलेला असला तरीही नेहमीप्रमाणे सण साजरा करावा.भोगीला सुगड पुजण्याची प्रथा आहे. काही ठिकाणी “वाण पूजन प्रथा” असेही म्हटले जाते. यामध्ये पाच छोटी मडकी पुजली जातात. या पाच मडक्यांत भाजी – भाकरी ठेवले जाते. सुगडांतील भाजी – भाकरी प्रसाद म्हणून संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे किंक्रांतीला खायची प्रथा आहे. संक्रांतीचे अंगभूत कर्म असल्यामुळे सुगडे घेण्यास अडचण नाही.आपल्या सर्वाना भोगीच्या हार्दिक शुभेच्छा…!